राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या 1 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश ,आ.संजय सावकारेंच्या मागणीला यश
"त्या'' शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ

मुंबई, दि. 10 जुलै : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले जातील, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. यामुळे गलेलठ्ठ वेतन असूनही फुकटचे रेशन तथा शिधा लाटणाऱ्या 1 लाखापेक्षा अधिक संख्या असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे.
विधानसभेत आज भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विधानसभा सदस्य राम सातपुते, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे यावेळी चर्चेत सहभागी झालेले होते.
याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज विधानसभेत म्हणाले की, राज्यातील १ लाख २६२ अधिकारी आणि कर्मचारी यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील ३ हजार १२३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शिधापत्रिका योग्य योजनेत वर्ग करण्याच्या सूचनाही सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले आहे.